तंजावरचे भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तंजावरचे भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तंजावरचे मराठा राज्यकर्ते

 



दक्षिणेतील त्रिचनापल्लीचा विजय राघव आणि तंजावरचा रघुनाथ नायक यांच्यातील यादवीचा फायदा घेत आदिलशहाचा सरदार म्हणून इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकले. व इसवी सन १६७६ मध्ये व्यंकोजीराजे तंजावरचे अधिपती बनले.
बढेविया येथील रजत पटात ३० डिसेंबर १६७६ रोजी व्यंकोजीने तंजावरावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केल्याचा उल्लेख आहे.
(Reference- Fifty Maratha Copper Plates)
तंजावरच्या शिलालेखात इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीने तंजावरावर प्रभुत्व प्रस्थापित केल्याचा उल्लेख आहे. परंतु शिलालेखात कालोल्लेखाच्या बाबतीत बराच गोंधळ होतो. त्यामुळे बढेविया ताम्रपटातील माहितीच प्रमाण मानावी लागते.
तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजी राजांनी आपली राजधानी बंगळूरहून तंजावरला हलविली. त्यांनी १६८५ दहा वर्ष तंजावरवर राज्य केले. त्यानंतर भोसले घराण्यातील अनेक शासकांनी तंजावरवर राज्य केले.
१८५५ साली तंजावर चे शिवाजी दुसरे यांच्या काळात लाॅर्ड डलहौसीच्या नव्या धोरणानुसार इंग्रजांनी तंजावर संस्थान दत्तक नामंजूर करून खालसा केले.






प्रतापसिंह राजेभोसले

 

प्रतापसिंह राजेभोसले (इ.स. १७३८ ते १७६३)
प्रतापसिंह हे तुळजा राजा पहिले यांचे कट्यारीशी लग्न लावलेल्या स्त्रीचे म्हणजेच अन्नपूर्णाबाईचे पुत्र होते.
तंजावरच्या शिलालेखात स्पष्ट उल्लेख आहे की,
" प्रताप सिंहाची माय राजाची समजातीची झाली याकरिता हा पुत्रच राज्यात योग्य म्हणून सर्वत्रांनी निष्कर्ष केला"
प्रताप सिंह यांची कारकीर्द धामधुमीचे झाली. प्रताप सिंहांना आपल्या दरबारातील यवन सरदार सय्यद खान व सय्यद कासिम आणि अर्काटचा नवाब चंदासाहेब यांच्या संयुक्त कारस्थानात तोंड द्यावे लागले. सय्यद खाद आणि सय्यद काशीद यांच्याकडे तंजावरच्या किल्ल्याची आणि राज्यात चिटणिसी असे मोठे अधिकार होते. आपल्या हातात सत्ता यावी म्हणून सय्यद खान व सय्यद कासीम प्रयत्न करीत होते. प्रतापसिंह राजेभोसले मात्र हुशार आणि व्यवहार चतुर असल्यामुळे त्यांनी सय्यद खान व सय्यद कासम यांचा बंदोबस्त केला.
यासमयी चंदासाहेबाने दोन महिने दिलेल्या वेढ्यात (१७४०) आपली शक्ती अपुरी पडत आहे असे वाटून प्रतापसिंहाने शाहूकडे मदत मागितली. मराठ्यांनी १७४१ मध्ये चंदा साहेबाचा पूर्ण पराभव केला व त्यास कैद केले. अर्काटचा नवाब व चंदासाहेब या दोघांचाही पराभव झाल्यामुळे तंजावरच्या प्रतापसिंहास आनंद झाला. बृहदीश्वर शिलालेखात म्हटले आहे की, "प्रताप सिंह याने आपला कारभारी नापास शेडगे यास रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले यांच्या अभिनंदनासाठी पाठविले."
9 मार्च १७६२ रोजी प्रतापसिंहांनी मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड यांना पत्र लिहिले त्यात शाहू महाराजांचे मदत घेऊन आपणास तंजावरचा बचाव करावा लागला हे अगदी स्पष्ट लिहिले आहे.
पुढे जून १७६२ मध्ये तंजावरकरांचे आणि चंदासाहेबाचे पुन्हा घनघोर युद्ध झाले. यात प्रतापसिंहांचे सरदार मानाजी जगताप यांनी चंदासाहेबास पकडून ठार मारले.
१७ डिसेंबर १७६३मध्ये प्रतापसिंहांचा मृत्यू झाला, आणि दुसरा तुळजा राजा तंजावरच्या गादीवर आला. प्रतापसिंहाच्या काळात स्थापत्य व शिल्पकलेचा बराच विकास झाला. कुंभकोणम आणि चिदंबरम येथील देवालयाचा जीर्णोद्धार केला गेला. साहित्य क्षेत्रातही प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीत लक्षणीय प्रगती झाली. प्रताप सिंह यांनी संस्कृत, मराठी, तामिळ, तेलगू भाषांतून रचना केल्या. राम पंडित, अंबाजी पंडित, शिवराम गोविंदासारख्या कवींना आणि आश्रय दिला.

मराठी संस्कृतीचा विचार करता तंजावर करांनी साहित्य आणि कलाक्षेत्रात जी भर घातली आहे तिचा विचार करणे किती आवश्यक आहे ते प्रतापसिंहाच्या कारकीर्दीत झालेल्या कला विकासावरून दिसून येते.

तुळजाराजा भोसले दुसरे

 

तुळजाराजा भोसले दुसरे (इ.स. १७६३-१७८७)

प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर तुळजा राजा दुसरे गादीवर आले. यांचाही काळ बराच धामधुमीचा होता. अर्काटचा नवाब महम्मदअली प्रतापसिंह यांच्या कारकिर्दीपासून आतल्या आत धुमसत होता. तुळजा राजांच्या कारकीर्दीत अर्काटचा नबाब याने तंजावरविरुद्ध हालचाली सुरू केल्या.
याच सुमारास कर्नाटकाचा राजकारणात हैदरअलीचा उदय झाला. १७६१ मध्ये प्रबळ झालेल्या हैदरअलीने नंदराजाच्या हातातून सत्ता बळकावून तो मैसूरचा सूत्रधार बनला. हैदरअलीस इंग्रज व अर्काटचा नवाब यांना शह देऊन आपली सत्ता कर्नाटकात निर्माण करावयाची होती. त्यासाठी हैदरअलीने त्रिचनापल्ली व तंजावरपर्यंत स्वाऱ्या करून दहशत निर्माण केली.
तुळजाराजा मात्र सर्व बाजूंनी कैचीत सापडले. अर्काटचा नवाब इंग्रज व हैदर अली यासारख्या शत्रूंनी ते चारी बाजूने वेढले गेले. या शत्रूंना तोंड देण्यात तुळजाराजा असमर्थ होते. त्यामुळे तुळजाराजांनी महाराष्ट्रात मराठ्यांकडे संधान साधले. शत्रु प्रबळ असल्यामुळे मराठे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तथापि पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांना सावरण्यास वेळ लागत होता.
तुळजाराजांनी यास्तव हैदरअलीस चार लाख रुपये रोख व पाच हत्ती नजर देऊन आपला बचाव केला. हा तह मराठ्यांच्या सल्लामसलतीने केला असावा असे कै. पारसनीस यांचे मत आहे.
१७७६ मध्ये तंजावरचे राज्य इंग्रजांच्या स्वामित्वाखाली गेले. अर्काटचा नवाब, मैसूरचा हैदरअली, कर्नाटकाचा नवाब, फ्रेंच आणि इंग्रज या सर्वांचा त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू होता, यात अखेरीस इंग्रजी यशस्वी झाले. १७७६ च्या तहाप्रमाणे तंजावरचा राजा इंग्रजांचा मांडलिक बनला. दुसऱ्या कोणत्याही राज्याशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय संबंध ठेवण्याचे अधिकार तंजावरचा राजाला राहिले नाही. त्यामुळे तंजावरचा राजा हा इंग्रजांच्या हातचे बाहुले बनला.
इंग्रजांनी तंजावरावर वर्चस्व प्रस्थापित केलेले पाहून हैदरअली संतप्त झाला जून १७८१ च्या अखेरीस हैदरने तंजावरावर स्वारी केली. परंतु यात हैदरअलीचा पराभव झाला.

तुळजा राजा स्वतः विद्वान आणि रसिक होता. मराठी भाषेतून राजाने भक्तिपर पदे लिहिली. त्यांच्या दरबारातही मराठी भाषेत रचना करणारे अनेक कवी होते. कृष्णकवी, रामकवी, शेषकवी आदि कवी तुळजाराजांच्या आश्रयाखाली होते. इसवी सन १७८७ मध्ये तुळजा राजांचा मृत्यू झाला.

सुजानबाई

 


सुजानबाई- (इ.स. १७३६-१७३८)
तंजावरचे व्यंकोजी दुसरे यांच्या मृत्यूनंतर तंजावरची सुत्रे त्यांची विधवा पत्नी सुजानबाई यांच्याकडे जवळजवळ तीन वर्षे होती. सुजानबाई यांनी तुळजाराजे पहिले यांचा मुलगा सयाजी यांच्या नावाने राज्याची सूत्रे हातात घेतली.
व्यंकोजी दुसरा यांच्या काळापासून अर्काटचा नवाब दोस्तअली चा सेनापती व जावई चंदासाहेब याची दृष्टी तंजावर कडे होती. इसवी सन १७३५ मध्ये चंदासाहेबानी तंजावरावर स्वारी केली. तेव्हा तंजावरकरांनी पेशव्यांकडे मदत मागितली असा पुरावा पेशवेकालीन कागदपत्रांमधून मिळतो.
इसवी सन १७३८ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेल्या पत्रात तंजावरला मदतीला जाण्यास रघुजी भोसले यास आज्ञा केलेली आढळते. रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले यांच्यापुढे चंदा साहेबाचे काही चालले नाही शेवटी चंदासाहेबाने मराठ्यांना खंडणी देण्याचे कबूल करुन माघार घेतली.
इ.स. १७३५ ते १७३९ या काळात तंजावरच्या गादीवर आलेले वारसदार वादग्रस्त आणि दुर्बल होते. त्यापैकी पहिला तथाकथित वारसदार काटराजा उर्फ शाहूजी याने व्यंकोजी दुसरामे यांच्या मृत्यूनंतर आपण तंजावर चे वारस आहोत असे भासवून तंजावरचा किल्लेदार सय्यद खान याच्या मदतीने सत्ता हस्तगत केली. ही हकिगत बृहदीश्वर शिलालेखात आहे.
काटराजाने सत्ता हस्तगत करताना इंग्रज आणि फ्रेंच यांना ही लाच देऊन वश करून घेतले होते. परंतु लवकरच तो कुप्पी किंवा रुपी नावाच्या परटिणीचा मुलगा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सर्व दरबार काट राजाच्या विरोधात उभा राहिला. दरबारातील ज्येष्ठ मंत्र्यांनी या तथाकथित वारसास म्हणजे काटराजास पदच्युत केले आणि तुळाराजा पहिला यांचा मुलगा सयाजी यास तंजावरच्या गादीवर बसविले.
सयाजीराजे दुर्बल असल्यामुळे त्यांचे अल्प कारकिर्दीत गोंधळ निर्माण झाला. सुजानबाई हा गोंधळ दूर करू शकल्या नाही. तंजावर करांचे जेष्ठ सरदार मल्हारजी गाडेराव, मानाजी जगताप, अनप्पा शेटगे या सरदारांनी सयाजीस दूर करून सरभोजी पहिला यांचा मुलगा प्रतापसिंह यांस इसवी सन १७३८ मध्ये तंजावरच्या गादीवर बसविले.
या घटनेबरोबरच सुजानबाई यांचा तंजावरच्या कारभारावरील प्रभाव संपला.

व्यंकोजी राजे दुसरे उर्फ बाबासाहेब

 




व्यंकोजी राजे दुसरे उर्फ बाबासाहेब (इ.स. १७३५ ते १७३६)

व्यंकोजी राजे दुसरे यांची कारकीर्द फारच कमी म्हणजे एकच वर्षाची झाली. व्यंकोजीराजांना त्यांचा भाऊ सयाजी यांनी कट कारस्थाने करून पदच्युत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यंकोजीराजे वेडे होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद बृहदीश्वर शिलालेखात आहे. त्यातील मजकूर पुढील प्रमाणे -
"बाबासाहेब राजे उपद्रवाने शके १६५८ मध्ये पिंगळ संवत्सरी देवगतीस पावले"
व्यंकोजी राजांचा मृत्यू इसवी सन १७३६ मध्ये झाला. व्यंकोजीराजे दुसरे यांच्या मृत्यूनंतर तंजावरची सुत्रे त्यांची विधवा पत्नी सुजानबाई यांच्याकडे जवळजवळ तीन वर्षे होती.
व्यंकोजीराजे हे तामिळ मराठी आणि उत्तर हिंदुस्तानी भाषेचे चांगले जाणकार होते. व्यंकोजीराजांनी या तिन्ही भाषेत रचना केल्या आहेत.

तुळजा राजा पहिले

 

तुळजा राजा पहिले (इ.स.१७२८-१७३५)
तुळजाराजा राजकारणी, मुत्सद्दी व विद्याभिलाषी होते. तुळजाराजांच्या काळात कर्नाटकाच्या नवाबाबाखेरीज आणखी कुणाशी संघर्ष झाला नाही. कर्नाटकात या काळात अनेक सुभेदार, नवाब आपले स्वतंत्र राज्य निर्माण करू पाहत होते. इसवी सन १७१० मध्ये कर्नाटकाचा नबवा दिवान सादतउल्लाखान हा आपली सत्ता वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे नवाबाची नजर त्याच्या शेजारील तंजावर व त्रिचनापल्ली या संस्थानांवर होती.
परंतु तुळजाराजांनी दक्ष राहून नवाबापासून तंजावर सुरक्षित ठेवले. मराठ्यांना या प्रसंगी तुळजाराजांस मदत करण्याची इच्छा होती हे पेशवे दप्तरातील कागदपत्रांवरून लक्षात येते. परंतु मराठ्यांची मदत तंजावरात पोहोचू शकली नसावी. कारण या वेळेस शाहू व कोल्हापूरचे संभाजी यांच्यात संघर्ष चालू असल्यामुळे मराठ्यांच्या फौजा महाराष्ट्रातच गुंतल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकात निजामाचे प्राबल्य वाढले.
शत्रूशी सामना करीत असताना कलेचे क्षेत्र तुळजा राजांनी दुर्लक्षित ठेवले नाही. तुळजा राजांनी स्वतः "संगीत सारामृत" नावाचा ग्रंथ लिहिला. तुळजाराजा यांनी स्वतः मराठी व तामिळ भाषेत भक्तीपर रचना केल्या. नृत्य कलेस प्रोत्साहन दिले. "कोव्यची साहित्याचे जीनस" ही तामिळ भाषेत नृत्य कलेवर आधारित रचना केली.

तुळजा राजांना लग्नाच्या पाच स्त्रिया होत्या. अरणाबाई, रामकुवर बाई, मोहिनाबाई, मैनाबाई व लक्ष्मीबाई अशी त्यांची नावे होती. बाबासाहेब सयाजी, अण्णासाहेब अशी तीन मुले तुळजा राजांना होती. अन्नपूर्णाबाई ही तुळजा राजांनी काट्यारीशी लग्न लावलेली स्त्री होती. तिचा पुत्र म्हणजेच प्रतापसिंह होय. तुळजा राजानंतर त्यांचा पुत्र बाबासाहेब गादीवर आले. हेच व्यंकोजी दुसरे म्हणून ओळखले जातात.

राजा सरभोजी पहिले

 

राजा सरभोजी पहिले (इ.स. १७११ ते १७२८)
तंजावर चे महाराजा दुसरे हे निपुत्रिक असल्यामुळे त्यांच्या नंतर त्यांचा कनिष्ठ बंधू सरभोजी पहिले गादीवर आले. सरभोजी राजांनी एकूण सोळा वर्ष राज्य केले. सरभोजी राजे हे शांतताप्रिय व सौम्य प्रकृतीचे होते.
सरभोजी राजांच्या कारकिर्दीत किरकोळ युद्धाचे प्रसंग सोडल्यास मोठी युद्ध झालेच नाहीत. याला एकच अपवाद म्हणजे मारवाच्या संस्थानातील वारस हक्कासंबंधीचा संघर्ष. या संघर्षामध्ये सरभोजी राजांनी मारवाचा एक वारसदार ताडदेव याला विरोध केला परंतु त्याबदल्यात दुसरा वारसदार भवानी शंकरने पंबर नदीच्या जवळचा प्रदेश देण्यात टाळाटाळ केली त्यामुळे सरभोजी राजांनी मारवाचे राज्य भवानीशंकर ऐवजी ताडदेवास मिळवून दिले.
इसवी सन १७२४ च्या सुमारास निजामाने आपली वक्रदृष्टी त्रिचनापल्ली कडे वळवली त्यामुळे तंजावरकरांना धोका निर्माण झाला होता. मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मुघल बादशहाकडून मिळाले होते, परंतु त्यांच्या हक्काला निजामाने आव्हान दिले. त्यामुळे निजामास शह देण्यास व आपला चौथाई सरदेशमुखीच्या हक्क बजावण्यास मराठ्यांच्या फौजा दक्षिणेत उतरल्या. मराठ्यांनी निजामाला प्रबळ होऊ दिले नाही आणि तंजावरचा धोका टळला.
किरकोळ युद्धाचे प्रसंग सोडल्यास सर्व राज्यांचे कारकीर्दही शांततेत पार पडली सरभोजींना गृहकलहाला मात्र तोंड द्यावे लागले. सरभोजी राजांचा बंधु तुळजाराछा स्वतंत्र पणाने राहत होता. सरभोजी राजांना तीन राण्या होत्या- सुलक्षणाबाई, अप्रूपबाईसाहेब, राजसबाईसाहेब.
तंजावरची गादी सरभोजी राजांच्या पश्चात त्यांचा भाऊ तुळजाराजा यास मिळणार होती. अप्रूप बाईस मात्र अशाप्रकारे वारसाहक्क तुळजाराजाकडे जाणे पसंत नव्हते. ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळे राजसत्ता आपल्याकडेच राहावी ही अप्रूपबाईची इच्छा होती. तिने आपल्याला पुत्र झाला असे खोटेच जाहीर करून वारसा हक्क आपल्या मुलाला मिळाला पाहिजे असा दावा मांडला. परंतु ही गोष्ट बनावट असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात सरभोजी राजांना खूप दुःख व मनस्ताप झाला. इ.स. १७२८ मध्ये सरभोजी राजांचा मृत्यू झाला. त्यांपाठोपाठ सुलक्षणाबाई व राजसबाई सती गेल्या.

बाह्य संघर्ष व अंतर्गत कलहाला तोंड देत असतानाच पूर्वीपासून चालत आलेली वाड्मयीन सेवा सरभोजींनी आपल्या राज्यात तशीच चालु ठेवली. त्यांनी अनेक प्रतिभावंतांना आश्रय दिला. 'विद्यापरिणय' सारखे मराठी नाटक, कुटात्मक श्लोक या काळातले रचले गेले. नाट्यसंगीतासारख्या कलांना सरभोजींनी प्रोत्साहन दिले व कलेच्या क्षेत्रात आपले नाव झळकत ठेवले.

शाहराजा दुसरा

 

शाहराजा दुसरा- (इ.स.१६८५-१७११)
व्यंकोजीपुत्र शाहराजांची कारकीर्द शांतेतत पिर पडली. शाहराजांच्या कारकिर्दीत फारसे युद्धाचे प्रसंग आले नाहीत. शाहराजा दुसरा यांच्या कारकीर्दीत महत्वपूर्ण घटना म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांना साह्य केल्याने झुल्फीकारखानाच्या स्वारीस शाहराजास तोंड द्यावे लागले.
महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून मुगलांविरूद्ध मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध चालू होते.१६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. १६८९ मध्ये झुल्फीकारखानाची रायगडावर स्वारी झाली, त्यावेळेस मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज औरंगजेबास चुकवून जिंजीकडे आलेले होते. १ एप्रिल १६९० रोजी झुल्फीकारखानाने जिंजीस वेढा घातला. या वेढ्यात झुल्फीकारखानाच्या मदतीस औरंगजेबाचा वजीर आसदखान व शहजादा कामबक्ष होते.
इ.स.१६९२ पर्यंत जिंजी जिंकण्यास मुघलांना यश आले नाही. या वेढ्यात शाहराजा दुसरा यांनी राजाराममहाराजांना सैन्य आणि पैशांची मदत केली. शाहराजा राजारामांचा चुलत भाऊ असल्याने ते राजारामस मदत करीत असणारच असे झुल्फीकारखानास वाटले. जिंजी जिंकण्यासाठी झुल्फीकारखानास वाटले. जिंजी जिंकण्यासाठी झुल्फीकारखानास आधी मराठ्यांना मिळत असलेली तंजावरचीषमदत बंद करण्यासाठी इ.स. १६९१ मध्ये तंजावरावर स्वारी करावी लागली. ह्या स्वारीत झुल्फीकारखानाने शाहराजा दुसरा यांजकडून खंडणी घेतल्याव्यतिरीक्त दुसरे काही उल्लेख सापडत नाहीत.
१६९९ मध्ये औरंगजेबाने झुल्फीकारखाना ऐवजी दाऊदखानाची कर्नाटकचा सुभेदार म्हणुन नियुक्ती केली. याच्याशी शाहराजाचे युद्धाचे प्रसंग आले नाहीत. "इ.स.१६९९ मध्ये शाहराजाने ट्रौकीबारला चाळीस हजार सैन्यासह वेढा घातला" याव्यतिरिक्त इतर कोणत्याही युद्ध प्रसंगाची माहिती उपलब्ध होत नाही. शाहराजा दुसरा यांनी मराठ्यांशी बिघडलेले संबंध पुनः सुधारले आणि अधिक दृढ केले.

२७ सप्टेंबर १७११ रोजी शाहराजा यांचा मृत्यू झाला. राज्याचे संरक्षण करीत असतानाच साहित्य आणि कला क्षेत्रातही शाहराजा दुसरे यांनी संस्मरणीय कामगिरी केली. सर्व दृष्टीने शाहराजांची कारकीर्द वैभवशाली ठरली.

व्यंकोजी/एकोजीराजे भोसले

 


शहाजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहागिरीचा हक्क त्यांचा मुलगा व्यंकोजी यांस प्राप्त झाला. शहाजी राजांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच होता. परंतु संभाजीचा मृत्यु कनकगिरीच्या युद्धात झाला, त्यामुळे जहागिरीची सूत्रे स्वाभाविकपणे व्यंकोजीराजांकडे आली. व्यंकोजी हे शहाजीराजांची दुसरी पत्नी तुकाबाई हिचे पुत्र होते.
व्यंकोजीराजांच्या जन्मतिथी बद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे. तंजावर च्या बृहदीश्वर मंदिरातील शिलालेखात शिवजन्माची साल १६२९ मानले आहे मात्र शिलालेखात तारखा व इ.स. च्या बाबतीत बऱ्याच चुका आहे. त्यामुळे शिवजन्माची साल ही चुकलेले आहे. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे कनिष्ठ बंधू होते, त्यामुळे व्यंकोजीचे जन्मसाल 1629 हे मानता येत नाही. देवीसिंग चौहाण मात्र शके १५५२ माघ फाल्गुन मध्ये व्यंकोजी राजांचा जन्म झाला असे मानतात. याचा अर्थ शिवजन्मानंतर लवकरच व्यंकोजी राजांचा जन्म झाला असावा.
थोरल्या संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शहाजीराजांनी व्यंकोजींवर कर्नाटकातील जहागिरीची जबाबदारी सोपविली. व्यंकोजीराजांनी आपल्या जहागिरीचा कारभार सांभाळला त्याचबरोबर विस्तारही केला. व्यंकोजीराजांनी त्यानंतर स्वपराक्रमाने तंजावर जिंकून घेतले. त्रिचनापल्लीचा विजयराघव व तंजावरचा रघुनाथ नायक यांच्यातील यादवीचा फायदा घेऊन आदिलशहाचा सरदार म्हणून १६७५ मध्ये व्यंकोजीराजांनी तंजावर जिंकले. व १६७६ मध्ये व्यंकोजीराजे तंजावरचे अधिपती बनले.
तंजावर जिंकल्यानंतर व्यंकोजीराजांनी आपली राजधानी बंगळूरहून तंजावर हलविली. व्यंकोजी राजांच्या कारकीर्दीत घडलेली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिवाजी महाराजांशी व्यंकोजी यांचा झालेला संघर्ष. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी आपला वडिलोपार्जित जहागिरीतील वाटा मागितला. व्यंकोजीराजांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली. परंतु समझोता झाला नाही. नंतर थोडा संघर्ष झाल्यावर तह होऊन समेट झाला. या स्वारी पासून पुढे इतिहासात तंजावर व स्वराज्यातील मराठ्यांचे वारंवार चांगले संबंध आले.
व्यंकोजी राजांनी आपल्या पराक्रमाने जहागिरीचे संरक्षण केले. व्यंकोजींनी नायक राजांप्रमाणे स्वतंत्र सत्ता स्थापन केली, त्याचबरोबर साहित्य माचे क्षेत्रही समृद्ध केले. अनेक कवींना आश्रय देऊन वाड्मय रचनेला प्रोत्साहन दिले.
व्यंकोजी राजांचा मृत्यू १६८४-१६८५ डिसेंबर-जानेवारीत झाला. व्यंकोजी राजांनंतर त्यांचा जेष्ठ पुत्र शाहराजा दुसरे तंजावरच्या गादीवर आले.




तंजावरचे भोसले


 

मराठ्यांच्या इतिहासामध्ये तंजावरच्या भोसले राजवटीचे प्रसंगानुरूप अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आढळतात. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर म्हणजे सतराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण मोहीम हाती घेतल्यावर मराठे आणि तंजावरचे भोसले यांचे राजकीय संबंध या ना त्या कारणाने वारंवार आलेले दिसून येतात.

१६७१ मध्ये व्यंकोजींनी स्वपराक्रमाने तंजावर जिंकून घेतले. व्यंकोजी राजांच्या कारकीर्दीपासून तंजावरचे महाराष्ट्रातील भोसल्यांशी संबंध येऊ लागले. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजीराजे यांच्यात वडिलोपार्जित जहागिरी वरून संघर्ष उत्पन्न झाला. अर्थात हा संघर्ष वगळता पुढे तंजावर आणि मराठी सत्ता यांच्यात परस्पर सहकार्याचे संबंध आले.
शंभूराजेंच्या काळात शाहराजा दुसरा यांनी चिदंबरम मधे नटराजाच्या मूर्तीची स्थापना केली. राजारामांच्या काळात मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात महाराज यांनी राजाराम यांना मदत केली या शिवाय शिवकालोत्तर काळात तंजावरचे राज्य जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा मराठ्यांनी त्यांना मदत पाठविली. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी तंजावरकरांनी कधी मराठ्यांची तर कधी इतर राज्यांची मदत घेतली. विशेषतः प्रतापसिंह छत्रपतींच्या कारकिर्दीत (१७३८-६३) मराठे व तंजावरचे सातत्याने संबंध आलेले दिसतात.
मराठ्यांच्या इतिहासात मराठे व तंजावरच्या भोसले यांचा संबंध हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तंजावरचे राज्य लहान आणि मांडलिक राज्य असले तरी या राज्यामध्ये मराठी संस्कृतीचा विस्मयकारक विकास घडून आला. समर्थ मराठ्यांची सत्ता ज्या महाराष्ट्रात होती त्या प्रदेशातही नृत्य,नाट्य आणि आणि इतर कला यांमध्ये जो विकास घडून आला नाही तो तंजावरला घडून आला हे एक स्वतंत्र वैशिष्ट्य ठरले.
त्याचप्रमाणे नृत्य, संगीत, शिल्प, चित्रकला या क्षेत्रातही तंजावरच्या मराठा राज्यात नेत्रदीपक प्रगती घडून आले या दृष्टीने मराठ्यांच्या इतिहासातील तंजावरचे स्थान लक्षात घेतले पाहिजे. असा हा तंजावरच्या मराठी सत्तेचा विषय महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा ठरतो.
परंतु या विषयाच्या अभ्यासाठी आतापावेतो उपेक्षाच झालेली दिसते. मराठ्यांच्या इतिहासात व्यंकोजीराजे सोडले तर तंजावरच्या कोणत्याही राज्यकर्त्याचा उल्लेखही क्वचितच आढळतो.
वास्तविक पाहता तंजावरच्या सरस्वती महालामध्ये मराठ्यांच्या इतिहासाला उपयुक्त असणाऱ्या असंख्य कागदपत्रांचा आणि हस्तलिखितांचा खजिना आहे. याच सरस्वती महालात दिवेकरांना महत्वपूर्ण अश्या "शिवभारताचा" शोध लागलेला आहे.

एकूण पृष्ठदृश्ये